JCL 2026: जळगावच्या ‘वानखेडे’वर जामनेरचा ‘अक्षय’ विजय; पाचोरा योद्धाजचा धुव्वा!
दिग्गजांच्या उपस्थितीत जळगाव क्रिकेट लीगचा दिमाखदार सोहळा; रामकृष्णा राठोड ठरला सामनावीर
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर टाकणाऱ्या ‘जळगाव क्रिकेट लीग २०२६’ (JCL T-20) चा रणसंग्राम शनिवारपासून मोठ्या थाटामाटात सुरू झाला. जैन ड्रीम स्पेसेसच्या हिरवळीवर रंगलेल्या पहिल्याच रोमांचकारी सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज् संघाने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर जामनेरने स्पर्धेची विजयी सलामी दिली आहे.
राजकीय व क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी
शनिवारी संध्याकाळी कांताई नगर येथील भव्य क्रीडांगणावर या स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, महापौर दीपमाला काळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी आकाश उजळून टाकणारी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
वानखेडेपेक्षा जळगावचे मैदान सरस : गिरीश महाजन
उद्घाटनपर भाषणात ना. गिरीश महाजन यांनी आयोजनाचे तोंडभरून कौतुक केले. “मी परवाच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होतो, पण जळगावचे हे मैदान पाहून मला अभिमान वाटतोय. हे मैदान वानखेडेपेक्षाही दर्जेदार आहे,” असे ते म्हणाले. याचवेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या रणजी क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देत, या स्पर्धेतून भविष्यातील राष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त केला.
