भयंकर! जगातील ‘हे’ शहर बनलंय सर्वात मोठे हॉटस्पॉट; ३० मिनिटांत शरीराची होतेय लाहीलाही, ६ तासांत मृत्यू !
सहारा वाळवंटालाही मागे टाकणारा सूर्यप्रकाशाचा थरार; ४७.६ अंशांच्या तापमानामुळे मानवी अस्तित्व धोक्यात!
विशेष प्रतिनिधी: एका बाजूला जगातील मोठी वाळवंटं उष्णतेसाठी ओळखली जात असताना, दुसरीकडे एका शहराने उष्णतेचे सर्व जागतिक विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या १० पैकी तब्बल ५ दिवस हे शहर जगातील ‘सर्वात उष्ण शहर’ म्हणून नोंदवले गेल्याने खळबळ उडाली आहे. २७ एप्रिल रोजी येथील पाऱ्याने ४७.६°C चा भयावह स्तर गाठला. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, या तापमानाचा तडाखा इतका तीव्र आहे की, एखादी निरोगी व्यक्ती जर ३० मिनिटे या उन्हात उघड्यावर राहिली, तर तिच्या शरीरातील पाणी सुकून मृत्यूचा प्रवास सुरू होऊ शकतो.
उत्तर प्रदेशातील ‘या’ शहराचे भयंकर वास्तव
हे मृत्यूचे हॉटस्पॉट ठरलेले शहर दुसरे तिसरे कोणते नसून उत्तर प्रदेशातील बांदा हे आहे. येथे सध्या जणू आकाशातून आग बरसत आहे. वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर, सामान्यतः मानवी शरीराला १०४°F ताप भरला की जीव व्याकुळ होतो, परंतु बांदा शहरात सध्या ११७.६°F इतकी जीवघेणी उष्णता आहे. अवघ्या १५ ते ४५ मिनिटांत शरीरातील नैसर्गिक ‘कुलिंग सिस्टिम’ कोलमडते. घामावाटे पाणी आणि क्षार वेगाने बाहेर पडल्यामुळे रक्त घट्ट होऊ लागते, ज्यामुळे अवयव निकामी होऊन ६ तासांच्या आत मृत्यू ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
बांदाच का ठरले ‘हॉट स्पॉट’?
सहारा वाळवंटापेक्षाही बांदा शहर इतके उष्ण का? या रहस्याचा उलगडा करताना शास्त्रज्ञांनी ५ प्रमुख कारणांकडे लक्ष वेधले आहे. येथील जमिनीखाली असलेले ग्रॅनाइट आणि नीसचे कठीण खडक सूर्याची उष्णता शोषून एखाद्या तव्यासारखे तापतात. तसेच, हे शहर कर्कवृत्ताच्या अतिशय जवळ असल्याने येथे सूर्याची किरणे थेट प्रहार करतात. सध्या या भागावर एक ‘हीट डोम’ (उष्णतेचा घुमट) तयार झाला असून, ज्याने गरम हवेला जमिनीलगतच कैद केले आहे.
निसर्गाच्या प्रकोपाचा इशारा
राजस्थानच्या वाळवंटातून येणाऱ्या उष्ण लहरींना रोखण्यासाठी बांदा जिल्ह्यात आता दाट जंगले किंवा डोंगररांगा शिल्लक नाहीत. १३.७२% वेगाने होणारी जंगलतोड आणि २३% वेगाने वाढणारे सिमेंटचे बांधकाम यामुळे येथील नैसर्गिक वातावरण पूर्णपणे नष्ट झाले आहे. दरवर्षी थंडावा देणारे ‘पश्चिमी विक्षोभ’ वारेही या शहरापर्यंत पोहोचले नाहीत. निसर्गाचा हा समतोल बिघडल्यामुळे उत्तर प्रदेशातील बांदा शहर सध्या संपूर्ण मानवजातीसाठी एक धोक्याची घंटा बनले आहे.
