गोदावरीला हंगामातील पहिला पूर; नांदूरमध्यमेश्वरमधून ५६ हजार क्युसेक विसर्ग
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा जोर; रामकुंड परिसर जलमय, आजही रेड अलर्ट
नाशिक | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनंतर नाशिक जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने जोर धरला. संततधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला असून रामकुंड परिसरातील पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. वाढत्या पाण्यामुळे दुतोंड्या मारुती मंदिराच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले असून गोदाकाठावरील अनेक लहान मंदिरे आणि टपऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत.
धरणातून ५६ हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून सुमारे ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी पुणे घाटमाथा, सातारा, नाशिक, कोल्हापूर घाटमाथा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारपासून विश्रांतीचे संकेत
राज्यातील मुसळधार पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची शक्यता असून शुक्रवारपासून अनेक भागांत पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
