भवानी फाट्याजवळ फटाका कारखान्यात भीषण आग
अग्निशमन दलच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
जळगाव : भवानी फाट्याजवळील मकरा फटाका कारखान्यात अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीचे स्वरूप काही वेळातच तीव्र झाले होते; मात्र अग्निशमन दल व स्थानिक यंत्रणेच्या तात्काळ प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती समोर आली आहे.

आग विझवण्यासाठी कर्मचारी व वाहन चालक देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण यांनी धाडसाने मदत केली. तसेच फायरमन वृषभ सुरवाडे, ललित पाटील, यश मनोरे, भुषण पाटील आणि संजय तायडे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या बचाव कार्यात जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन गाड्यांसह शेंदुर्णी ग्रामपंचायतीच्या वाहनांनीही सहकार्य केले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही; मात्र घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
