आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट!
भुसावळ, जळगावसह खान्देशातील वारकऱ्यांसाठी पंढरपूरकडे धावणार १६ विशेष फेऱ्या
जळगाव | प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन जाहीर केले आहे. भुसावळ-पंढरपूर, नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर आणि खामगाव-पंढरपूर या मार्गांवर एकूण १६ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार असून, जळगाव व भुसावळ स्थानकांवरही या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे खान्देशातील हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भुसावळ-पंढरपूरसाठी अनारक्षित विशेष रेल्वे
भाविकांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूरदरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेच्या चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक ०११५९ ही २४ आणि २५ जुलै रोजी भुसावळ येथून दुपारी १.३० वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक ०११६० ही २५ आणि २६ जुलै रोजी पंढरपूरहून रात्री १०.३० वाजता भुसावळकडे रवाना होईल.
नागपूर-मिरज विशेष गाडीची सुविधा
गाडी क्रमांक ०१२०५ ही २३ व २४ जुलै रोजी नागपूरहून सकाळी ८.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५० वाजता मिरजला पोहोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०१२०६ ही २४ व २५ जुलै रोजी मिरजहून दुपारी १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
अमरावती-पंढरपूर विशेष गाडी
गाडी क्रमांक ०१११९ ही २१ आणि २४ जुलै रोजी नवी अमरावती येथून दुपारी २.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११२० ही २२ आणि २५ जुलै रोजी पंढरपूरहून सायंकाळी ७.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता नवी अमरावतीला पोहोचेल.
खामगाव-पंढरपूर मार्गावरही विशेष फेऱ्या
गाडी क्रमांक ०११२१ ही २१ आणि २३ जुलै रोजी खामगावहून सकाळी ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०११२२ ही २२ आणि २४ जुलै रोजी पंढरपूरहून पहाटे ५ वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता खामगावला पोहोचणार आहे.
वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा
आषाढी वारीच्या काळात दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. विशेष रेल्वे गाड्यांच्या नियोजनामुळे खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.
> “विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे हजारो वारकऱ्यांना आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.” – मध्य रेल्वे प्रशासन
