एरंडोलच्या आकाश त्रिवेदीची ‘यूपीएससी’त उत्तुंग भरारी; देशात ७३ वी रँक!
आयआयटी कानपूरचा पदवीधर, ‘आयआयएम’ची संधी नाकारून निवडली देशसेवेची वाट
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय आकाश ओम त्रिवेदी याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत कमी वयात देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धा परीक्षेत मिळवलेले हे यश एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात; मात्र त्यापैकी मोजकेच उमेदवार अंतिम यादीत स्थान मिळवू शकतात. अशा परिस्थितीत एरंडोलसारख्या लहान शहरातील तरुणाने देशात ७३ वा क्रमांक मिळवत आपली बुद्धिमत्ता, मेहनत आणि चिकाटी सिद्ध केली आहे.
आकाश त्रिवेदी याचे शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत उज्ज्वल राहिली असून त्याने देशातील नामांकित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत बीटेक पदवी प्राप्त केली आहे. आयआयटीमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याने देशसेवेच्या भावनेतून स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याची निवड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद येथेही झाली होती; मात्र कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च वेतनाच्या करिअरचा मार्ग निवडण्याऐवजी त्याने प्रशासकीय सेवेची खडतर वाट निवडली.
आकाशच्या या यशाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे या परीक्षेच्या तयारीसाठी त्याने कोणत्याही खासगी मार्गदर्शन वर्गाचा किंवा महागड्या शिकवणीचा आधार घेतला नाही. केवळ नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण परिश्रम आणि स्व-अभ्यासाच्या (Self-study) जोरावर त्याने हे यश खेचून आणले आहे. चालू घडामोडी, इतिहास, समाजशास्त्र, अर्थव्यवस्था आणि प्रशासन या विषयांवर त्याने विशेष लक्ष केंद्रित केले होते. कोणत्याही बाह्य दडपणाशिवाय केवळ जिद्दीच्या जोरावर त्याने पहिल्या १०० रँकर्समध्ये आपले स्थान निश्चित केले.
आकाशच्या या उत्तुंग यशामागे त्याच्या कुटुंबियांचेही मोठे योगदान आहे. त्याचे वडील ॲड. ओम त्रिवेदी आणि आई रेखा त्रिवेदी यांनी त्याला लहानपणापासूनच उत्तम शिक्षण, वाचन आणि सामाजिक घडामोडींची आवड निर्माण करून दिली. मुलावर यशाचे अनावश्यक दडपण न आणता त्याला स्वतःची स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची पूर्ण मोकळीक व प्रेरणा दिल्याचे कुटुंबियांनी सांगितले. आकाशच्या या यशामुळे एरंडोल शहरात आनंदाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी तो एक नवा प्रेरणास्त्रोत ठरला आहे.
