प्रभाग १३ मध्ये राजकीय वातावरण तापले
सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी महायुतीला पसंती
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात शाश्वत व सर्वांगीण विकासाला नागरिकांकडून प्राधान्य दिले जात असून, त्यासाठी सत्ताधारी महायुतीशी संलग्न उमेदवारांना अधिक पसंती मिळत असल्याचा दावा महायुतीच्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
प्रभागातील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर, नितीन प्रभाकर सपके आणि सुरेखा नितीन तायडे हे सध्या प्रचार फेऱ्या, घरभेटी आणि संवाद सभांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. प्रचारादरम्यान नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा तसेच सार्वजनिक मूलभूत सोयीसुविधा या प्रश्नांना अग्रक्रम देण्याची स्पष्ट अपेक्षा व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या या अपेक्षा लक्षात घेता, “सत्तेसोबत असलेले प्रतिनिधित्व प्रभागाच्या विकासासाठी अधिक प्रभावी ठरते,” असा सूर प्रभागातून उमटत असल्याचे चित्र आहे. शासन व महापालिकेच्या माध्यमातून निधी, योजना आणि कामे मार्गी लावण्यासाठी महायुतीचे प्रतिनिधीच अधिक सक्षम ठरतील, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत असल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधील राजकीय लढत सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेपली असून, आगामी काळात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
