प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या विकासात्मक प्रचाराचा जोर
शाश्वत विकासाचा मुद्दा प्रभावी; अपक्ष उमेदवारांना प्रचारात बसला धक्का
जळगाव (प्रतिनिधी):जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये राजकीय वातावरण तापले असले, तरी मतदारांचा कल भावनिक आवाहनांपेक्षा शाश्वत व दीर्घकालीन विकासाकडे अधिक झुकत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. अपक्ष उमेदवारांकडून प्रचारात भावनांना हात घालणाऱ्या भाषणांवर भर दिला जात असताना, स्थानिक नागरिक मात्र मूलभूत सुविधा, ठोस नियोजन आणि भक्कम विकास या मुद्द्यांनाच प्राधान्य देताना दिसत आहेत.
प्रभागातील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर, नितीन प्रभाकर सपके आणि सुरेखा नितीन तायडे यांनी प्रचारादरम्यान घेतलेल्या घरभेटी, संवाद सभा आणि प्रचार फेऱ्यांमधून मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा तसेच सार्वजनिक सोयीसुविधा या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक १३ मधील राजकीय लढत सध्या निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, यंदाच्या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरी सुजाण व विचारपूर्वक मतदान करणाऱ्या मतदारांचा कल स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने झुकताना दिसत आहे. “प्रभागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर सत्ताधारी महायुतीशी संलग्न प्रतिनिधित्व अधिक फायदेशीर ठरेल,” अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिकांमध्ये आकार घेत असल्याचा दावा महायुतीच्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सत्तेसोबत असलेले प्रतिनिधीच अधिक प्रभावी ठरतील, असा सूर सध्या प्रभागातून उमटत असून, त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या समीकरणांवर होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
