जळगावात आज ‘राष्ट्रीय लोक अदालत’; प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याची सुवर्णसंधी
जळगाव: वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित राहणारे खटले सामोपचाराने आणि विनाविलंब निकाली काढण्यासाठी आज, शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी जळगाव येथे ‘राष्ट्रीय लोक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात हा उपक्रम राबविला जात असून, यात शेकडो प्रकरणे तडजोडीने निकाली निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आयोजित या लोक अदालतीचे अध्यक्षपद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी भूषवित आहेत. या मोहिमेत जिल्हा वकील संघ, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका प्रशासनाचे सक्रिय सहकार्य लाभत आहे. प्रामुख्याने मोटार वाहन ट्रॅफिक चलन, भूसंपादन, धनादेश अनादर (चेक बाऊन्स), वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, तसेच दिवाणी व फौजदारी स्वरूपाची तडजोडयोग्य प्रकरणे या अदालतीमध्ये ठेवली जाणार आहेत. विशेष म्हणजे, न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांसह ‘दाखलपूर्व’ (Pre-litigation) प्रकरणांनाही यात स्थान देण्यात आले आहे.
राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था आणि दूरसंचार कंपन्यांकडून थकीत देयकांमध्ये विशेष सवलत जाहीर करण्यात आल्यामुळे नागरिकांना कमी खर्चात आणि सन्मानपूर्वक आपले जुने वाद संपवण्याची ही उत्तम संधी आहे. ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे निकाली काढायची आहेत, त्यांनी आपल्या वकिलांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे. तसेच, वेळेवर तडजोडीसाठी येणाऱ्या प्रकरणांचीही दखल घेतली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
