काटेवाडीत पार्थिवाचे अंत्यदर्शन; ११ वाजता शासकीय इतमामात होणार अंतिम संस्कार
लाडक्या ‘दादां’चा अखेरचा प्रवास; बारामतीसह अवघा महाराष्ट्र शोकाकुल
बारामती/पुणे (विशेष प्रतिनिधी): दिलेल्या शब्दाचा पक्का आणि जनमाणसाचा आधारवड असलेल्या अजितदादांना नियतीने इतक्या अकाली हिरावून न्यावे, या कल्पनेनेच आज बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

बुधवारी सकाळी ८:४६ मिनिटांनी झालेल्या त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा करुण अंत झाला. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागराचे डोळे पाणावले आहेत.

विमानतळावर काळाचा घाला: पाचही जणांचा मृत्यू
निवडणूक प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे झेपावलेल्या विमानाचा धावपट्टीवर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. ६६ वर्षे ६ महिने आणि ६ दिवसांचे आयुष्य लाभलेले अजित पवार यांच्यासह वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी यादव हे पाचही जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. विमानाला लागलेली आग इतकी भीषण होती की, मदतकार्य पोहोचण्यापूर्वीच सर्व संपले होते.
हुंदके आणि आक्रोश: बारामतीत भावूक वातावरण
अपघाताचे वृत्त समजताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयात सकाळपासूनच अलोट गर्दी उसळली होती. ज्यावेळी ‘दादां’चे पार्थिव रुग्णालयात आणले, त्यावेळी ‘अजितदादा अमर रहे’, ‘एकच वादा, अजितदादा’ आणि ‘दादा परत या’ अशा घोषणांनी बारामतीचा आसमंत दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी घातलेला टाहो आणि नागरिकांचे हुंदके उपस्थितांच्या काळजाला घर पाडत होते.

कुटुंबीय आणि नेत्यांची उपस्थिती
घटनेच्या वेळी दिल्लीत असलेल्या खासदार सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांनी तातडीने बारामती गाठली. हॉस्पिटलमध्ये आपल्या लाडक्या व्यक्तीचा देह पाहून कुटुंबीयांचा बांध फुटला. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री बारामतीत दाखल झाले आहेत.
आज होणार अंतिम संस्कार
अजित पवार यांचे पार्थिव आता काटेवाडी येथील निवासस्थानी असून, तेथून सकाळी अंत्ययात्रेला सुरुवात होईल. सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यविधीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिल्लीतील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव चोख बंदोबस्त ठेवला असून, केवळ अधिकृत व्यक्तींनाच अंत्यविधीच्या मुख्य ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.

प्रशासनावर मजबूत पकड असलेला, पहाटे ६ वाजता जनतेसाठी हजर राहणारा आणि ‘शब्दाचा पक्का’ असा हा लोकनेता आज कायमचा शांत झाला आहे.
