जळगावचा पारा ४२.४ अंशांवर; उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा
हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस ४३ अंशांपर्यंत तापमानाचा अंदाज; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
जळगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेच्या तीव्रतेत काहीसा बदल दिसून आला असून शुक्रवारी कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. तर किमान तापमानही २८.८ अंशांवर स्थिर राहिले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून दि. १६ रोजी तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर मात्र हळूहळू तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
१७ मेपासून उष्णतेच्या तीव्रतेत काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून १८ ते २१ मे या कालावधीत कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे तसेच उष्माघातापासून संरक्षण करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आले आहे.