तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच संपला; थलपती विजय मुख्यमंत्रीपदी
काँग्रेससह मित्रपक्षांचा पाठिंबा; आज घेणार शपथ
चेन्नई | प्रतिनिधी तामिळनाडूच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या मध्यस्थीने बहुमतासाठी आवश्यक असलेले ११८ आमदारांचे समर्थन मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटला आहे.
विधानसभा निवडणुकीत १०७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे संस्थापक विजय यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी काँग्रेस, भाकप, माकप आणि व्हीसीके या पक्षांच्या आमदारांच्या समर्थनपत्रांसह ११८ आमदारांचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांना सादर केले.
बहुमताचा आकडा पार केल्यानंतर राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी हिरवा कंदील दिला असून ते शनिवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र अखेर विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. चेन्नईसह राज्यभरात टीव्हीके कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात असून विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
