चोपड्यात तरुणाच्या खूनप्रकरणी तीन जण जेरबंद
२४ तासांत पोलिसांची कारवाई; मुंबईहून परतताना केली अटक
चोपडा : प्रतिनिधी शहरातील नारायण नगर परिसरात सोमवारी पहाटे उघडकीस आलेल्या प्रदीप माळी या तरुणाच्या निघृण खूनप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तिघांना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे, मुंबईकडे पसार झालेल्या दोन आरोपींना परत येताना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणात चेतन सुभाष कानडे (३६) याला आधी ताब्यात घेतल्यानंतर विजय भास्कर बेदकर (३४, रा. भाग्योदय नगर, चोपडा) आणि निर्मल संजय बडगुजर (२६, रा. चिंच चौक, चोपडा) या दोघांना पोलिसांनी चाळीसगाव येथे रेल्वेतून अटक केली.
खून केल्यानंतर आरोपी मुंबईकडे पळाल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. आरोपींचे मोबाईल लोकेशन सतत बदलत असल्याने ते कधी बोरिवली, कधी ठाणे तर कधी कल्याण येथे असल्याचे दिसत होते. काही काळानंतर आरोपींनी मोबाईल स्विच ऑफ केल्याने पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला.
त्यानंतर मुंबईहून जळगावकडे येणाऱ्या रेल्वेगाड्यांवर लक्ष ठेवत नाशिक व मनमाड स्थानकांवर तपासणी करण्यात आली. अखेर चाळीसगाव स्थानकावर आलेल्या एका रेल्वेच्या डब्यांची तपासणी करताना आरोपी आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले.
घटनास्थळी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने खूनपूर्वी मद्यप्राशन झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि जितेंद्र वल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
