शेतकऱ्यांनी वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांचे आवाहन
शेतकरी स्तरावरून ई-पिक नोंदणीसाठी 20 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ
जळगाव: खरीप हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात कडधान्य व तेलबियांची खरेदी करण्यात येणार आहे. नाफेड व NCCF च्या वतीने ही खरेदी प्रक्रिया राज्यातील पणन महासंघामार्फत पार पाडली जाणार असून, यात मुंग, उडिद, सोयाबीन व तुर या पिकांचा समावेश आहे.
आधारभूत दराने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणीसह 7/12 उतारा आवश्यक राहणार आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक, कार्यक्षम आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा महासंघाचे संचालक संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम आणि संचालक संजय पवार यांनी सांगितले. दरम्यान, खरीप हंगाम 2025 करिता ई-पिक पाहणी मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरून 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, राज्यातील काही भागात झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी आदी कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत ई-पिक पाहणी करता आली नाही. शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, याकरिता शासनाने शेतकरी स्तरावरून ई-पिक नोंदणीसाठी 20 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी 21 सप्टेंबर ते 4 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सहायक स्तरावरून पूर्ण केली जाईल.
पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांचे आवाहन
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा, यासाठी शासनाने दिलेल्या मुदतीत आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शेतकऱ्यांनी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत पार पाडल्यासच शेतकरी आधारभूत दराने आपले पीक विकू शकतील. त्यामुळे कोणताही शेतकरी याकडे दुर्लक्ष करू नये.शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा आणि वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी.” असे आवाहन पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी केल्याचे जिल्हा पणन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.