जळगाव: दुचाकीने कामावरून घरी परत जाणाऱ्या एका प्रौढाला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली जवळ घडली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
कामावरून घरी पतरणाऱ्या दुचाकीस्वार विठ्ठल पांडुरंग शेळके (वय ५५, रा.रामेश्वर कॉलनी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विठ्ठल शेळके हे एका नाश्त्याच्या दुकानावर कामाला होते. रात्री दुकानावरुन ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी भुसावळ कडून ईच्छादेवी चौफुलीकडे भरधाव वेगाने डाळ घेऊन जाणाऱ्या जाणाऱ्या (जीजे १४, एटी २४२४) क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीस्वार विठ्ठल शेळके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत विठ्ठल शेळके यांना मयत घोषीत केले.
दरम्यान, पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचेकाम सुरु होते. शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.