खर्दे येथे वीज पडून बैल ठार, सालदार भाजला; लोंढवे येथे वादळी वाऱ्याने लिंबू बागा उद्ध्वस्त
अमळनेर, : खर्दे येथील पोलीस पाटील संभाजी पाटील यांच्या शेतात सायंकाळी वीज कोसळून एक बैल जागीच ठार झाला असून तीन गुरे गंभीर जखमी झाली आहेत. या दुर्घटनेत सालदारही गंभीर भाजला आहे. दुसरीकडे लोंढवे येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लिंबू बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
खर्दे येथे सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानक पाऊस व वीज पडण्याचा प्रकार घडला. शेतात कुट्टी मशीनवर काम सुरू असताना पाऊस सुरू झाल्याने सालदार गाड्याखाली बसला होता. त्यावेळी गाड्याला पाच गुरे बांधलेली होती. विजेच्या जबर धक्क्याने एक बैल जागीच ठार झाला तर इतर तीन गुरे जखमी झाली. या घटनेत सालदार राहुल राजेंद्र बारेला गंभीर भाजल्यामुळे डोळ्यांना अंधारी येत असल्याची तक्रार आहे. त्याला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नर्मदा फाउंडेशन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील व मुकेश साळुंखे यांनी भेट दिली.
दरम्यान, लोंढवे गावात १२ मे रोजी आलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे शेतकरी संजीव नामदेव पाटील (गट क्र. ३१२) व सुमनबाई नामदेव पाटील (गट क्र. ३१५) यांच्या लिंबू बागांतील सुमारे १०० झाडे उन्मळून पडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, फळबाग योजनेंतर्गत शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.