पुणे ( वृत्तसंस्था), – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या निकालानंतर अनेकांकडून “ईव्हीएम’बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषणाची भूमिका घेतली होती. शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोडले. यावेळी त्यांनी उपोषण सुटले असले तरी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ठणकावून सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, राक्षसी बहुमत मिळूनही महाराष्ट्रात आनंद का साजरा होत नाही? बहुमत मिळूनही या लोकांवर शपथ घेण्यासाठी राजभवनात जाण्याऐवजी शेतात जाऊन पूजाअर्चा करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणालेत. बाबा आढाव हे प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व आहे. ही प्रेरणा केव्हाच म्हातारी होऊ शकत नाही. वणवा पेटवण्यास एक ठिणगी पुरेशी असते. बाबा आढाव यांचे हे आंदोलन ती ठिणगी आहे. राज्यात महायुतीला राक्षसी बहुमत मिळाले. पण महाराष्ट्रात कुठेही त्याचा आनंदोत्सव नाही. हरलेल्यांना व जिंकलेल्यांनाही या निकालावर विश्वास नाही. स्पष्ट बहुमत मिळूनही हे लोक राजभवनात जाण्याऐवजी शेतात पूजाअर्चा करण्यासाठी जात आहेत. हे लोक अमावस्येला पूजा करण्यासाठी गेले, यावरून त्यांची मानसिकता दिसून येते, असे उद्धव ठाकरे यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हणाले.